महाराष्ट्र

महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा विनयभंग करून 500 मीटर फरफटत नेणारा रिक्षाचालक जेरबंद !

ठाणे, 15 ऑक्टोबर – महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात एका 22 वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा विनयभंग करून तिला वाहनाने काही अंतरापर्यंत फरफटल्या प्रकरणी पोलिसांनी रिक्षाचालकाला अटक केली आहे. एका अधिकाऱ्याने शनिवारी ही माहिती दिली.

ठाणे नगर पोलिस ठाण्याच्या पथकाने शुक्रवारी सकाळी घडलेल्या या घटनेतील ३६ वर्षीय आरोपीला नवी मुंबई शेजारील दिघा येथून काही तासांतच अटक केली.

ठाणे नगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जयराज रणवरे म्हणाले, “आम्ही २४ तासांत आरोपीला पकडले.

आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची तीन पथके तयार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, सीसीटीव्ही फुटेज स्कॅन केल्यानंतर पोलिसांनी गुप्तचर माहितीच्या आधारे आरोपीला पकडले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘विद्यार्थिनी कॉलेजला जात असताना रस्त्यावर उभ्या असलेल्या एका रिक्षाचालकाने तिच्याबद्दल काही शेरेबाजी केली. याबाबत तरुणीने विचारणा केली असता आरोपीने तिचा हात पकडून तिला आपल्याकडे खेचले. यानंतर आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला असता तरुणीने त्याचा हात पकडला.

त्यानंतर रिक्षाचालकाने वाहन सुरू केले आणि मुलीला वाहनासह सुमारे 500 मीटरपर्यंत ओढले, त्यामुळे ती खाली पडली आणि आरोपी पळून गेला, असे अधिकाऱ्याने सांगितले.

या प्रकरणासंदर्भात प्राप्त झालेल्या तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहिता (IPC) कलम 354, 354 (A), 336, 279 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

Back to top button
error: Content is protected !!