महाराष्ट्र

1013 विद्युत सहाय्यकांची नियुक्ती, महावितरणच्या अविश्रांत प्रयत्नांना यश !

औरंगाबाद : विद्युत सहाय्यक पदाच्या भरतीचा मार्ग मोकळा झाल्यानंतर महावितरणने मागील आठ दिवसात अविश्रांत परिश्रम घेत राज्यभरातील १ हजार १३ विद्युत सहाय्यकांना राज्यात विविध ठिकाणी आयोजित कार्यक्रमात आज नियुक्तीपत्रे देण्यात आली.

मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान केंद्रात झालेल्या ‘महासंकल्प’ या कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महावितरणच्या १० विद्युत सहाय्यकांना नियुक्तीपत्रे देऊन या संकल्पाचा शुभारंभ करण्यात आला.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये ७५ हजार रोजगार देण्याचा संकल्प राज्य शासनातर्फे राबविण्यात येत आहे. विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित ‘महासंकल्प’ या कार्यक्रमात उर्वरित सर्व विद्युत सहाय्यकांना नियुक्तीपत्रे आज देण्यात आली आहेत.

कागदपत्रांची पूर्णत: पडताळणी करून पात्र ठरलेल्या उमेदवारांमध्ये अकोला परिमंडल – ५७, अमरावती परिमंडल – ३८ औरंगाबाद परिमंडल- ६२, बारामती परिमंडल- १४३, भांडुप परिमंडल – ८३, चंद्रपूर परिमंडल – २२, गोंदिया परिमंडल- ९, जळगाव परिमंडल – १०३, कोल्हापूर परिमंडल- १०४, कल्याण परिमंडल – ७८, लातूर परिमंडल – ७०,

नागपूर परिमंडल – ३७. नांदेड परिमंडल – ३९, नाशिक परिमंडल – ७६, पुणे परिमंडल – ६० आणि रत्नागिरी परिमंडल- ३२ अशा एकूण एक हजार १३ उमेदवारांना विद्युत सहाय्यक या पदाची नियुक्तीपत्रे देण्यात आली. महावितरणच्या विभागीय स्तरावर या विद्युत सहाय्यकांची पदस्थापना करण्यात आली असून त्यांना तांत्रिक कामाचे प्रशिक्षणही देण्यात येईल.

महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक (मासं/प्रकल्प) प्रसाद रेशमे, कार्यकारी संचालक अरविंद भादीकर यांच्यासह मानव संसाधन विभागातील सर्व अधिकाऱ्यांनी मागील आठ दिवस अविश्रांत प्रयत्न करीत जास्तीत जास्त विद्युत सहाय्यकांना नियुक्तीपत्रे देण्याचा यशस्वी प्रयत्न केला.

महावितरणने मुख्यालयापासून परिमंडल स्तरापर्यंत विद्युत सहाय्यक या पदाच्या उमेदवारांशी प्रत्यक्ष संपर्क साधून त्यांनी कागदपत्रांच्या पडताळणीसाठी यावे, असे आवाहन करीत आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे.

आलेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी त्यांना सहकार्य करीत राज्य शासनाचा ‘महासंकल्प’ हा उपक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यात महावितरणने महत्वपूर्ण भूमिका पार पाडली आहे.

Back to top button
error: Content is protected !!