महाराष्ट्रराष्ट्रीय
Trending

औरंगाबादसह दहा राज्यांमध्ये संशयितांच्या घरावर छापेमारीने खळबळ ! दहशतवाद्यांना वित्तपुरवठा केल्याचा गंभीर आरोप !!

आमचा निषेधाचा आवाज दाबण्यासाठी केंद्रीय एजन्सींच्या गैरवापराचा तीव्र विरोध - पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया

नवी दिल्ली, 22 सप्टेंबर – राष्ट्रीय तपास संस्था (NIA) आणि अंमलबजावणी संचालनालय (ED) ने गुरुवारी सकाळी दहा राज्यांमध्ये दहशतवादी वित्तपुरवठा करण्यात सहभागी असलेल्या संशयितांच्या कार्यालय, निवासस्थानावर छापे टाकले. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.

त्यांनी सांगितले की, छाप्यांदरम्यान, एनआयए आणि ईडीने दहशतवाद्यांना समर्थन केल्याच्या आरोपाखाली पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) च्या सुमारे 100 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

अधिकार्‍यांच्या मते, हे छापे प्रामुख्याने दक्षिण भारतात टाकले जात आहेत आणि एनआयएने याला “आतापर्यंतचे सर्वात मोठे तपास ऑपरेशन” म्हटले आहे.

एनआयएने म्हटले आहे की, निधी उपलब्ध करून देणे, त्यांच्यासाठी प्रशिक्षणाची व्यवस्था करणे आणि प्रतिबंधित संघटनांमध्ये सामील होण्यासाठी लोकांना फसवणे यात गुंतलेल्या व्यक्तींच्या घरांवर छापे टाकले जात आहेत.

अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, दहा राज्यांमध्ये छापे टाकले जात आहेत आणि पीएफआयच्या प्रमुख नेत्यांसह सुमारे 100 कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

पीएफआयने निवेदन जारी करून म्हटले आहे की, “पीएफआयच्या राष्ट्रीय, राज्यस्तरीय आणि स्थानिक नेत्यांच्या घरांवर छापे टाकले जात आहेत. राज्य समिती कार्यालयावरही छापे टाकण्यात येत आहेत.

पीएफआयने म्हटले आहे की, “आमचा निषेधाचा आवाज दाबण्यासाठी केंद्रीय एजन्सींच्या गैरवापराचा तीव्र विरोध करतो.”

दरम्यान, महाराष्ट्रात एटीएसच्या विविध पथकांनी मुंबई, नवी मुंबई, ठाणे, औरंगाबाद, पुणे, कोल्हापूर, बीड, परभणी, नांदेड, मालेगाव (नाशिक जिल्हा) आणि जळगाव येथे छापे टाकले, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

ते म्हणाले की, एटीएसच्या पथकांनी राज्यातील विविध ठिकाणांहून किमान 20 जणांना अटक केली आणि महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली.

ते म्हणाले की, एटीएसने मुंबई, नाशिक, औरंगाबाद आणि नांदेड येथे भारतीय दंड संहितेच्या विविध कलमान्वये चार गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणांसंदर्भात एटीएस अधिकारी काही लोकांची चौकशीही करत आहेत.

Back to top button
error: Content is protected !!