महाराष्ट्रराष्ट्रीय
Trending

लोकनेते गोपीनाथराव मुंडेंच्या स्वप्नपूर्तीकडे मोठे पाऊल, रेल्वे प्रकल्प पूर्ण करून बीड जिल्ह्यात उद्योगधंदे उभारण्याचा मानस – पंकजा मुंडे

बीड, दि. 23 – आज लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या स्वप्नपूर्तीकडे एक मोठे पाऊल नगर-आष्टी रेल्वेसेवेच्या माध्यमातून पडले आहे. हा रेल्वे प्रकल्प पूर्ण करून बीड जिल्ह्यात उद्योगधंदे उभारण्याचा आमचा मानस आहे, आपल्या माणसांना दळणवळनाचे माध्यम उपलब्ध व्हावे, त्यांच्या हातांना काम मिळावे, त्यांची भरभराट व्हावी हा आमचा प्रयत्न असल्याची ग्वाही भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी दिली.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे , भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खा. सुजय दादा विखे पाटील, आ. सुरेश धस, आ. बाळासाहेब आजबे यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत या रेल्वेसेवेचा शुभारंभ सोहळा झाला. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे यांनी यावेळी ऑनलाईन पद्धतीने कार्यक्रमात सहभाग घेऊन उपस्थितांशी संवाद साधला.

पंकजाताई म्हणाल्या की, 2014 सालच्या लोकसभा पोट निवडणुकीत मी बीड जिल्ह्याच्या जनतेला मुंडे साहेबांचे स्वप्न पूर्ण करण्याचे वचन दिले होते. आज साहेबांची स्वप्नपूर्ती आणि वचनपूर्ती होते आहे याचा मनस्वी आनंद होतो आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे ही आज विशेष आभार मानते, 2014 साली बीड येथे त्यांनी रेल्वे प्रकल्प पूर्ण करण्याचा मनोदय व्यक्त केला होता. राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांनी कधीही निधीची कमतरता भासू दिली नाही. केंद्र सरकारच्या समप्रमाणत आणि वेळोवेळी त्यांनी निधी उपलब्ध करून दिला.

मध्यंतरीच्या दोन वर्षांमध्ये राज्य सरकारचा निधी मिळाला नाही, परिणामी प्रकल्पाच्या कामात अनेक अडचणी आल्या. परंतु राज्यात आपले सरकार आले आणि 244 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. येणाऱ्या काळात रेल्वे प्रकल्पाला गती देण्यात येईल, हा रेल्वे प्रकल्प पूर्ण करून बीड जिल्ह्यात उद्योगधंदे उभारण्याचा आमचा मानस आहे, आपल्या माणसांना दळणवळनाचे माध्यम उपलब्ध व्हावे, त्यांच्या हातांना काम मिळावे, त्यांची भरभराट व्हावी हा आमचा प्रयत्न आहे आणि निश्चित आम्ही या प्रयत्नांची पूर्तता करणार आहोत.

नगर-बीड-परळी हा रेल्वे प्रकल्प बीड जिल्ह्यासाठी विकासाच्या वाटा निर्माण करणारा ठरणार आहे, परळीहुन जेंव्हा बीड,आष्टी,नगर मार्गे रेल्वे मुंबईला जाईल तेंव्हा खऱ्या अर्थाने बीड जिल्ह्यातील प्रत्येकाचे स्वप्न पूर्ण होईल व जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय साध्य होईल.

या रेल्वेमार्गासाठी संघर्ष करणाऱ्या प्रत्येकासाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे. रेल्वेचे हे यश लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांना समर्पित आहे, हे यश तुमच्या स्वप्नांना,विश्वासाला समर्पित आहे, हे यश कष्टकरी शेतकऱ्यांना आणि मुलांना शिक्षणाची वाट सुकर करणाऱ्या रेल्वेचे स्वप्न बघणाऱ्या माऊलीला समर्पित आहे, हे यश रेल्वेसाठी लढा देणाऱ्या आणि प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्या सर्वाना समर्पित आहे, असेही पंकजाताई यावेळी म्हणाल्या.

Back to top button
error: Content is protected !!